तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यातील एका न्यायालयाने नऊ पोलिसांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.
भारतात पहिल्यांदाच 9 पोलिसांना एकाचवेळी फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यातील एका न्यायालयाने नऊ पोलिसांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. लॉकडाऊनमध्ये वडील आणि मुलाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही घटना सहा वर्षांपूर्वी घडली होती.
लॉकडाऊनमध्ये वडील आणि मुलाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. 2020 मध्ये तुतीकुडी जिल्ह्यातील साथनकुलम पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला होता. पी. जयराज (वय 51 वर्षे) आणि त्यांचा ३१ वर्षीय मुलगा जे. बेनिक्स यांना 19 जून रोजी कोविड-19 लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. जयराज हे मोबाईल दुकानाचे मालक आहे. परवानगी दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान उघडे ठेवल्याचा आरोप करत त्यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली होती. हा आरोप नंतर खोटा सिद्ध झाला. पोलिसांनी त्यांना साथनकुलम पोलीस ठाण्यात नेले आणि चौकशीच्या नावाखाली रात्रभर त्यांचा निर्घृणपणे छळ केला. नातेवाईकांनी आरोप केला की, त्यांना काठ्यांनी मारहाण करण्यात आली, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले.
एका महिला कॉन्स्टेबलची साक्ष या प्रकरमात महत्वाचा पुरावा ठरली. पोलीस स्टेशनच्या टेबलावर आणि काठ्यांवर रक्ताचे डाग आढळले होते. नंतर दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, परंतु काही दिवसांतच जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देशभरात पोलीस क्रूरतेविरोधात तीव्र संताप उसळला. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला राज्य सीआयडीने केला होता, परंतु मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सीबीआयने तपास हाती घेतला. सीबीआयने एका इन्स्पेक्टर, दोन सब-इन्स्पेक्टर आणि अनेक कॉन्स्टेबल्ससह 10 पोलिसांना अटक केली होती.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
आरोपींवर खून, कट रचणे आणि पुरावा नष्ट करणे यांसारखे गंभीर आरोप ठेवण्यात आले. तपासा दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज देखील हटवण्यात आले. यामुळे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. तपासादरम्यान आरोपींपैकी एका पोलिस उपनिरीक्षकाचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला. सहा वर्षांनंतर, 2026 मध्ये, मदुराई न्यायालयाने खटल्याची सुनावणी पूर्ण केली. मार्च 2026 मध्ये, सर्व नऊ पोलिसांना खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले.
हा मृत्यू नैसर्गिक मृत्यू असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला. मात्र, हा मृत्यू नैसर्गिक नसून मारहाणीत मृत्यू झाला हे सिद्ध झाले. 6 एप्रिल 2026 रोजी, मदुराई येथील प्रथम अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने नऊ पोलिसांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. निरीक्षक एस. श्रीधर, उपनिरीक्षक पी. रघु गणेश, के. बालकृष्णन, हेड कॉन्स्टेबल एस. मुरुगन, ए. समिदुराई आणि कॉन्स्टेबल एम. मुथुराज, एस. चेल्लादुराई, एक्स. थॉमस फ्रान्सिस आणि एस. वेलुमुथू अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
सीबीआय आणि पीडितेच्या कुटुंबीयांनी मृत्युदंडाची मागणी केली होती. न्यायालयाने, हे प्रकरण पोलीस अत्याचाराचे एक गंभीर उदाहरण असल्याचे नमूद केले. इतकचं नाही तर सर्वात कठोर शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पोलीस कोठडीत होणाऱ्या मृत्यूंच्या विषयावर देशव्यापी चर्चा सुरू झाली. अनेक संघटना आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच कोर्टाने पोलीस अधिकाऱ्यांना दोषी ठरवत थेट मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.
