राज्यातील शाळांची गुणवत्ता व विकास आराखडा निश्चित करण्यासाठी शाळांची तपासणी केली जाणार.

मुंबई:- राज्यात तपासणीसाठी तब्बल साडेसात हजार कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली १९०० पथके सज्ज ठेवण्याचे आदेश सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.महाविद्यालयांना ज्याप्रमाणे मूल्यांकन करून नॅक श्रेणी दिली जाते, त्याचप्रमाणे आता शाळांचेही मूल्यांकन केले जात आहे. त्यासाठी राज्य शाळा मानक प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच शाळा गुणवत्ता आणि आश्वासन आराखडा (स्काॅफ) तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकडून ३० जूनपर्यंत स्वमूल्यांकनाची प्रक्रिया करवून घेण्यात आली आहे.आता शाळांनी स्वमूल्यांकन करताना दिलेली माहिती खरी की खोटी, याची प्रत्यक्ष खात्री केली जाणार आहे. म्हणजेच शाळांचे बाह्यमूल्यांकन केले जाणार आहे. या बाह्यमूल्यांकनासाठी म्हणजेच शाळांच्या तपासणीसाठी तब्बल १९०० पथके गठित करण्याचे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिले आहेत. १५ जुलै ते ३१ जुलै या १५ दिवसांच्या कालावधीत ही तपासणी केली जणार आहे.